सांधण दरी (सांधण व्हॅली)

सह्याद्री च्या प्रेमात असलेला मी.

गेल्या ३ वर्षांपासून ज्या जागेचे फोटोज बघून "यार किती सुंदर जागा आहे, इकडे आयुष्यात एकदा तरी जाणार"  ही वाक्य बाहेर पडायची, तिकडे जाऊन, तिथुन असंख्य आठवणींची शिदोरी घेऊन परत येणं याला "स्वप्नपूर्ति" असं म्हटले तर त्यात काही नवल नाही. 

सांधण व्हॅली ! सह्याद्री मधली एक खोल दरी, आशिया खंडातील क्रमांक दोनची खोल दरी.अत्यंत सुंदर आणि तितकीच भयाण. सांधण व्हॅली ची खोली फक्त २०० फूट असली, तरीही त्या २०० फूट मध्ये सह्याद्रीचं  सौंदर्य ठळकपणे दिसतं ! रतनगड, कळसुबाई शिखर, अलंग मदन कुलंग यांनी वेढा दिलेली अशी ही "valley  of shadows" म्हणजे प्रत्येक गिर्यारोहकासाठी अगदी ऑल इन वन पॅकेजच !

नाशिक जवळील भंडारदरा येथील सामरद गावातून सांधण व्हॅली मध्ये जाता येते. सामरदला पोहोचण्यासाठी आम्ही रात्री कसारा ची ट्रेन पकडली. रात्री १.३० वाजता कसाऱ्याला पोहोचलो. यावेळेस चा ट्रेक हा drifters सोबत चा होता, आणि त्यांच्या सोबत मी आधीच अलंग-मदन-कुलंग केल्याने मी काही नवखा नव्हतो. उलट सगळे जुने मित्र जसे भेटले, तशी ट्रेक ची उत्सुकता १०० पटीने वाढली! कसाऱ्याहून आम्ही गाडी मध्ये बसलो, आणि सामरद गावाकडे निघालो. वाटेत चहा पिण्यासाठी थांबलो, तेव्हा प्रत्येकानी आपापली ओळख करून दिली. जवळपास ५ वाजेपर्यंत आम्ही सामरद गावात पोहोचलो, आणि नाश्ता केला. सकाळच्या प्रहरात सगळेच थंडीने कुडकुडत होते, आणि नुकताच चुलीवरून काढलेला चहा सुद्धा २ मिनिटात थंड होत होता. पोहे खाऊन, चहा पित सगळे टवाळक्या करत होते. ज्यावेळेस ट्रेक सुरु व्हायच्या आधीच ट्रेक ची मजा यायला लागते, तेव्हा समजून जायचं की आपण अगदी योग्य लोकांसोबत योग्य ठिकाणी आलो आहोत. सामरद गावापासून पुढे जवळपास १५ किमी वरून सांधण  व्हॅली ची सुरुवात होते. साधारण ६.३० च्या आसपास आम्ही ट्रेक ला सुरुवात केली. 

अखंड दगडांची वाट
 
सांधण  व्हॅली ची गम्मत म्हणजे माझ्या मते हा सह्याद्री मधला एकमेव ट्रेक आहे जो पूर्ण करण्यासाठी चढावं नाही लागत, उतरावं लागतं . सांधण व्हॅली मध्ये पूर्ण उतरण्यासाठी फक्त २ किमी चा रस्ता आहे. ऐकायला सोपं  आहे, पण उतरताना तितकाच कठीण. व्हॅली मध्ये जर तुम्ही पायवाट वगैरे शोधायला गेलात तर तुमचा अख्खा दिवस तसाच वाया जाईल, कारण पायवाट, रस्ता हे सगळं इकडे फोल आहे. एकावर एक अश्या असंख्य खडकांनी बनलेली ही दरी,  रस्त्यात हरवायची भीती नसली, तरी आपलं भान मात्र नक्की हरवतं . भल्या मोट्ठ्या दगडांवरून उड्या मारत, घसरत, सावकाश पाय टाकून पुढे जात असताना आपल्याला आपल्या अश्मयुगीन पूर्वजांची आठवण येते. 
पाण्याची वाट 

ट्रेक सुरु करताच पहिल्या अर्ध्या तासात पाण्याची वाट येते. छातीएवढं खोल पाणी, त्यातून आपली मोठी बॅग घेऊन जाणं हे एक आव्हान आहे. आम्ही सर्वांनी बूट काढले, बॅग टाकल्या, आणि पाण्यात उतरलो. मनुष्य साखळी बनवून आधी एकमेकांच्या डोक्यावरून बॅग पुढे पाठवल्या. त्यात अनेक बॅग पाण्यात पडल्या, आणि अनेकांची अंघोळ सुद्धा झाली. बॅग पुढे दिल्यानंतर सगळे पाण्यात मनसोक्त भिजले, फोटो काढले, मजा केली. आत्ताशी तर ट्रेक सुरु झाला होता! 

पाण्याच्या वाटेस जवळपास पुढचा १-१.३० तास फक्त दगडांची वाट आहे. इकडून तिकडून उड्या  मारत फक्त खाली उतरत राहायचं . दरीत उतरत असल्याने अनेक वेळा उतरताना तोल जाण्याची भीती असते, आणि उतरताना समोरून खोल घळई मधून अनेक मनमोहक आणि काळजाचा ठोका चुकवणारी द्रुश्य आहेत. एक क्षण तर असं वाटतं की सगळं सोडून इकडेच शांतता आणि निसर्गाच्या सुंदरतेचा आस्वाद घेत पडून राहावं . दगडांच्या वाटेवरून चालून चालून पाय दुखायला लागले की मग एका मागोमाग एक rappelling चे patches  येतात. एकूण ४ rappelling  patches  आहेत, ज्यातला पहिला ८० फुटांचा आहे, आणि बाकीचे अगदीच छोटे, ३०-४० फुटांचे आहेत. पण त्याची लांबी किंवा उंची याने अजिबात फरक नाही पडत, कारण प्रत्यके वेळेस भीती हि तेवढीच वाटते. दगडाच्या वाटेवर चालून पाय दुखतात, आणि rappelling ला दोरी पकडून हात! 
गिरकी घ्यायच्या आधी

Rappelling आणि माझा ३६ चा आकडा आहे हे मला त्याच दिवशी कळलं. मी ह्या आधी सुद्धा rappelling केलंय, पण काय माहित का नेमका ह्या वेळचा माझा अनुभव हा बाकी सगळ्यांसपेक्षा वेगळा होता! मला एक खात्री नक्की होती की  मी पडणार नाही, मी संपूर्ण सुरक्षित आहे. मी तयारीत सुरुवात केली, वरून मित्रांना आवाज दिला "व्हिडीओ काढ रे" आणि पहिले २० फूट अगदी यशस्वीपणे खाली उतरलो. नंतर मी एकदा खाली वजन टाकलं , तशी माझ्या शरीराने एक जोरात गिरकी घेतली आणि मी ढेपाळलो. इकडून तिकडे झोपाळा घेत असल्यासारखं हलत होतो. एका ठिकाणी तर माझ्या वजनदार बॅगेमुळे मी एका कपारीत अडकून बसलो, आणि मला हलताच येईना! ह्या सगळ्या धुमश्चक्री मध्ये  माझं कोपर फुटलं . कसाबसा खाली आलो आणि मोकळा श्वास घेतला. Rappelling ची ती २ मिनिटं  मी कधीच नाही विसरणार. 

आणखी एक गम्मत अशी, की ट्रेक च्या दरम्यान झालेल्या इतर किरकोळ जखमा आपल्याला कश्या झाल्या? हा प्रश्न मला अनेकदा पडतो. सगळं अगदी सुरळीत चालू असताना अचानक पायाला झोंबायला लागतं; आणि मग कळतं  की अरे आपल्याला तर जखम झाली आहे, आणि तिकडून रक्त वाहतंय. असं माझ्या सोबत अनेकदा झालयं, आणि ह्यावेळेस सुद्धा त्याला अपवाद नाही. गुडघा, दंड, पायाची नळी यावर झालेल्या जखमा ह्या कधी आणि कश्या झाल्या हा विचार करणं कधीच सोडून दिलंय . 

पहिल्या rappelling patch  नंतर सगळे छोटे छोटे patches आहेत. आम्ही २ patch नंतर डबा खाल्ला आणि पुढे गेलो. दुःख या गोष्टीचं आहे की एवढे आव्हानात्मक patches  होते, की ते पार करायच्या नादात त्यांचे फोटो काढायचे राहून गेले. त्यामुळे त्यांचं इकडे कितीही वर्णन केलं तरी तिकडे आलेल्या मजेला आणि वाटलेल्या भीतीला न्याय देता येणार नाही. 

तिसरा आणि चौथा patch  पार करायच्या २ वाट होत्या. एक तर rappelling , आणि दुसरा म्हणजे दोरीने पकडून खाली उतरायचं . माझ्या नुकत्याच आलेल्या rappelling च्या अत्यंत छान अनुभवामुळे मी दोरी पकडून उतरायचं ठरवलं. ३ दगडांनी तयार झालेल्या फटींमध्ये एक दोरी सोडली होती आणि त्या दोरी च्या जीवावर आपल्याला खाली उतरायचं होतं . Rappelling ने दोन्ही patches  उतरायला सोपे होतात. चौथा patch  म्हणजे पूर्ण धमाल आणि बिन-तिकिटाचा शो होता. तिथेही तसंच, एक rappelling चा रस्ता आणि एक दोरीचा. त्या दिवशी मला प्रचिती आली कि खाज ही  एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला अनेकदा अडचणीत आणते. मी दोरी पकडून उतरायला लागलो. दोरी पकडून हात दुखायला लागला, आणि मी जमिनीपेक्षा जवळपास १२-१५ फूट वर असताना दोरी सोडली, आणि खाली येऊन आपटलो. दोरी हाताला घासल्याने हात प्रचंड झोंबत होते. एकूणच, अवस्था खराब होती. मी सगळ्यात पहिले उतरलो होतो म्हणून मग मी मस्त बॅग टाकून त्यावर आडवा पडून इतरांची मजा बघत होतो. मला स्वतःला लागलेलं असल्याने मी कोणाला मदत करायला नाही गेलो, कारण जर मी स्वतःला नाही  सांभाळू शकलो, तर इतरांना कसा सांभाळेन? 

४.३० च्या आसपास आमचे सगळे rappelling patches संपले होते, ट्रेक जवळपास पूर्ण झाला होता. एक अगदी छोटी पाण्याची वाट पार केली की मग पुढे चालत जाऊन कॅम्पिंग च्या जागेवर बॅग टाकून मनसोक्त झोपायचं , हे एकच ध्येय मी सध्या मनाशी बाळगलं होतं . कारण दिवसच तितका थकवणारा होता! 

कॅम्पिंग पॉईंट. 
५.३० - ६ च्या आसपास आम्ही सगळे कॅम्पिंग च्या जागी पोहोचलो. ट्रेक यशस्वी झाला होता, आणि तो  ठरवलेल्या वेळेच्या आत झाला याचा सगळ्यांनाच आनंद होता! सगळे आपापले तंबू टाकून अराम करायला गेले. गेल्या गेल्या चायनीज भेळ, सूप, चहा यांचा आस्वाद घेत सगळे सुस्तावले होते. आराम झाल्यानंतर ९.३० च्या आसपास जेवण करून सगळे झोपी गेले.आम्ही काही जण रात्री १२ पर्यंत हळू आवाजात गाणी ऐकत, चंद्राच्या लख्ख प्रकाशात पत्त्यांचा डाव टाकून बसलो होतो. मला गम्मत ह्या गोष्टीची वाटते कि आपण शहरात राहून आपल्याकडे रात्री १२ वाजता इतका काळोख असतो, आणि त्या गावात रात्री १२ ला चंद्राचा एवढा लख्ख प्रकाश! म्हणंजेच आपण सर्वांनी तंत्रज्ञानाच्या नावाखाली प्रदूषण नावाच्या सैतानाला जन्म दिलाय! 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरा आवरी झाली, नाश्ता करून सगळे फोटो काढण्यात मग्न झाले. 

सांधण  वरून परत येण्याचे २ वेगळे रस्ते आहेत. एक करोळी घाटातून जो तुम्हाला पुन्हा सामरद गावात नेऊन सोडतो, आणि दुसऱ्या आसनगाव जवळील देहणे गावात नेऊन सोडतो. परत सामरदला जायला ५ तास लागतात तर देहणे  गाव फक्त २ तासांवर आहे. आम्ही १० वाजता चालायला सुरुवात केली आणि १२ वाजेपर्यंत खाली पोहोचलो सुद्धा! आमच्या साठी गाड्या आधीपासूनच तयार होत्या. आम्ही गाडीत पटापट बॅग टाकल्या आणि आसनगाव साठी निघालो. ठाण्याला पोहोचून आमच्या परंपरे प्रमाणे आम्ही मित्रामित्रांनी मिसळ खाल्ली आणि घरी गेलो. 

Drifters सोबत असल्याने कसलीच चिंता नव्हती. सगळे लोक ओळखीचे होते. एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाला refreshment साठी पॅकेट्स दिले जातात. त्यांची मॅनेजमेण्ट, गावातल्या लोकांशी असलेले सलोख्याचे संबंध हे सगळंच कौतुकास्पद आहे. सांधणचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी Drifters चा खूप आभारी आहे!


Difficulty level - Medium to Hard
Recommended season - Winter.  

Comments

Popular posts from this blog

PEB FORT (VIKATGAD)

GHODBUNDER FORT